अंजीर लागवड
अंजीर लागवड
दक्षिण अरबस्थान हा देश उगमस्थान असणारऱ्या अंजीर या फळझाडाचा प्रसार भूमध्य समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात झाला.
भारतात व्यापारी दृष्टीने अंजीराची लागवड फकत महाराष्ट्रातच केली जाते. सध्या महाराष्ट्रात एकूण ४१७ हेक्टर क्षेत्र अंजीर लागवडीखाली असून त्यापेकी ३१२ हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र एकटया पूणे जिल्हयात आहे. सातारा व पूणे जिल्हयाच्या शिवेवरील नीरा नदीच्या खो-यातील खेड-शिवारापासून जेजूरीपर्यंतचा १०-१२ गावांचा परिसर हाच महाराष्ट्रातील अंजीर उत्पादनाचा प्रमुख भाग होय. औरंगाबादजवळील दौलताबाद भाग, नाशिक आणि पूर्ण खानदेश जिल्हयात या फळझाडाची थोडीफार लागवड होते.
अंजीर हे कमी पाण्यावर येणारे काटक फळझाड आहे. अलिकडे सोलापूर-उस्मानाबाद येथे (अंजीराची) लागवड शेतकरी करू लागले आहेत. त्यावरुन अंजीर हे सर्व दुष्काळी भागात उत्तम होईल असे म्हणायला हरकत नाही.
अंजिराच्या फळातील भरपूर अन्नमूल्ये व पोषणक्षमता यांमुळे अंजिराचे फळ फार पूर्वी पासून खाण्यासाठी उपयोगात आणले जाते. अंजिरामध्ये १० ते २८% साखर असून फळ चवीला थोडे आंबटगोड असते. अंजिराच्या फळात चुना, लोह तसेच 'अ' आणि 'क' जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. अंजिराच्या फळात इतर फळांच्या तुलनेत भरपूर खनिजद्रव्ये असतात. अंजिराचे फळ त्याच्या औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. अंजिराचे फळ शक्तिवर्धक सौम्य रेचक, पित्तनाशक आणि रक्तशुद्धी करणारे आहे.
अंजिराचा वापर सध्या बासुंदी, आइस्क्रीम, बर्फी, जॅममध्ये होऊ लागला आहे. अंजिराच्या आकारानुसार त्याचा दर्जा ठरतो. मोठ्या आकाराच्या अंजिराच्या किलोचा भावही जास्त आहे. सर्वसामान्यपणे अंजीर हे उच्चभू्र लोकाचे फळ असा समज होता; पण शहरात आता अंजीर खाण्याबद्दल जागृती होत आहे. अंजीर जितका जुना तितके त्याच्यातील औषधी गुण वाढत जातात. त्यामुळे अशा अंजिराला आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून मागणी अधिक असते. लग्नसराई, हिवाळ्याच्या काळात अफगाणी अंजिराला मोठी मागणी होते.
हवामान :
उष्ण व कोरडे हवामान अंजिराला चांगले मानवते. त्यामुळे महाराष्ट्रात हे फळ आणखी मोठया क्षेत्रात करायला भरपूर वाव आहे. कमी उष्णतापमान या पिकाला घातक ठरत नाही. ओलसर दमट हवामान मात्र निश्चितपणे घातक ठरते. विशेषतः कमी पावसाच्या भागात जिथे ऑक्टोबर ते मार्चपर्यंत पाण्याची थोडीफार सोय आहे अशा ठिकाणी अंजिर लागवडीस वाव आहे.
जमीन :
अगदी हलक्या माळरानापासून मध्यम काळया व तांबडया जमिनीपर्यंत अंजीर लागवड शक्य आहे. भरपूर चुनखडी असलेल्या तांबूस काळया जमिनीत अंजीर उत्तम वाढते. चांगला निचरा असलेली एक मीटर पर्यंत खोल असलेली कसदार जमीन अंजीरासाठी उत्तम होय. मात्र या जमिनीत चुन्याचे प्रमाण असावे. खूप काळया मातीची जमिन या फळझाडाला अयोग्य असते. खोलगट आणि निचरा नसलेल्या जमिनीत हे झाड पाहिजे तसे चांगले वाढत नाही.
जाती :
१) पुणेरी अंजीर : ही जात पुरंदर तालुक्यात आणि दौलताबाद परिसरात लागवडीखाली आहे. या जातीस दिवे सासवड असेही म्हणतात. या जातीची फळे ३० - ५० ग्रॅम वजनाची असून गराचा रंग तांबूस असतो. साल पातळ असून गरात साखरेचे प्रमाण १४ -१५ टक्के इतके असते.
२) दिनकर : ही जात मराठवाडा कृषि विद्यापीठाने दौलताबाद परिसरातून निवड करून वाढविली आहे. या जातीची फळे आणि गोडी, पुणे अंजिरापेक्षा सरस असल्याचे नमूद केले आहे.
अभिवृध्दी :
अंजिराची अभिवृध्दी फाटे कलमाने केली जाते. खात्रीच्या बागायतदाराच्या रोगमुक्त बागेतील जोमदार वाढीची झाडे निवडून नंतर त्यातून उत्महाराष्ट्रम व दर्जेदार फळे देणारी झाडे निवडावीत व अशा झाडावरील १.२५ सेमी जाडीच्या आठ ते बारा महिने फांदया कलमासाठी निवडतात. लावण्यासाठी फाटेकरताना फांदीच्या तळाचा भाग व शेंडयाकडील कोवळा भाग छाटून टाकावा व मधला भाग रोपे तयार करण्यासाठी वापरावा. फाटे कलम तीस ते चाळीस सेमी लांब असावेत. त्यावर किमान चार ते सहा फूगीर व निरोगी डोळे असावेत. कलमांचा तळाचा काप डाहेळयाच्या काही खाली घ्यावा. आणि वरचा काप डोळयाच्या वर अर्धा सेमी जागा सोडून घ्यावा. दोन्ही काप गोलाकार घ्यावेत. फाटे कलम गादी वाफयावर ३० × ३० सेमी वर किंवा दोन डोळे मातीत जातील अशी लावावीत. कलमे किंचीत तिरिपी करावीत. लावण्यापूर्वी कलमाच्या बुडांना आय.बी.जे. किंवा सिरेडिक्स यासारखे एखादे मूळ फोडणारे संजीवक लावले तर मुळया लवकर फूटतात.
लागवड :
अंजिराच्या लागवडीसाठी निवडलेली जमीन उन्हाळ्यात तयार करावी. ६ x ६ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सेंमी आकाराचे खड्डे तयार करावेत. प्रत्येक खड्ड्यात १ किलो सुपर फॉस्फेट आणि २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत टाकून खड्डे १:२ या प्रमाणात शेणखत व पोयट्याची माती यांच्या मिश्रणाने पावसाळ्यापूर्वी भरावेत. लागवड जून - जुलै महिन्यात तयार कलमे लावून करावी. लागवडीनंतर ३ ते ४ दिवसांच्या अंतराने कलमांना पाणी द्यावे. कलमांना बांबुंचा आधार द्यावा. कलमांना जर्मिनेटर ५ मिली/लि. पाणी या प्रमाणे द्रावण तयार करून २५० मिली द्रावणाची आळवणी (ड्रेंचिंग) करावे. म्हणजे पांढऱ्या मुळीचा जारवा वाढून त्यांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे कलमांची वाढ लवकर जोमदार होते.
अंजिराची लागवड जून - जुलै ते सप्टेंबर - ऑक्टोबर या महिन्यात करावी. लागवडीसाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे ६ x ६ किंवा ५ x ५ मीटर अंतर ठेवावे.
वळण आणि छाटणी :
छाटणीमुळे अंजिराच्या झाडाला व्यवस्थित आकार देतो येतो. तसेच मशागतीची कामे सुलभतेने करता येतात आणि झाडावर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
अंजिराच्या झाडाच्या छाटणीचा मुख्य उद्देश झाडाला जास्तीतजास्त फुटवे आणणे हा असतो. अंजिराच्या झाडावर छाटणीनंतर येणाऱ्या नवीन फुटीवर फलधारणा होते. म्हणून अंजिराच्या झाडाची नियमित छाटणी करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात अंजिराची झाडे सुप्तावस्थेत असतात. सप्टेंबरनंतर तापमानात वाढ होते. म्हणून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मागील वर्षीच्या फांद्यांची योग्य रितीने छाटणी करावी. छाटणी करताना फांदीचा जोर पाहून ती शेंड्याकडील भागाकडून छाटावी. छाटणी केल्यामुळे फांदीच्या राहिलेल्या भागावरील डोळे फुटून नवीन फूट येते आणि नंतर नवीन फुटीवर फळे येतात. एका प्रयोगावरून असे दिसून आले आहे की, अंजिराच्या झाडाच्या प्रत्येक फांदीचा शेंड्याकडील ५ ते ६ सेंमी लांबीचा भाग छाटून टाकल्यास अथवा झाडाची हलकी छाटणी केल्यास छाटणी केलेल्या भागाच्या खालच्या भागावर २ ते ३ डोळे फुटून नवीन वाढीवर भरपूर फळे लागतात. छाटणीनंतर अंजिराच्या झाडावर जर्मिनेटर ५० मिली + प्रिझम ५० मिलीची १० लि. पाण्यातून फवारणी केल्यास अधिक डोळे फुटून भरपूर फुटवे मिळतात.
फांद्यांना खाचा पाडणे (नॉचिंग) : अंजिरामध्ये उत्पादन वाढविण्यासाठी छाटणीप्रमाणेच फांद्यांवर खाचा पाडणे ही एक महत्त्वाची आणि उपयुक्त पद्धत आहे.
अंजिराच्या फांदीवरील डोळ्याच्या वर २.५ सेंमी लांब आणि १ सेंमी. रुंद तिरकस काप घेऊन खाचा पाडतात. फांदीवर खाच पाडताना साल आणि अल्प प्रमाणात खोडाचा भाग काढला जातो. साधारणपणे ८ - ९ महिने वयाच्या फांदीवर जुलै महिन्यात खाचा पाडतात. त्यामुळे फांदीवरील सुप्त डोळे जागृत होऊन नवीन फुटव्यांची संख्या वाढते. एका फांदीवरील छाटलेल्या भागाखालील तीन - चार डोळे सोडून खाचा पाडाव्यात.
खते :
अंजीराच्या झाडांनी नीट व जोमाने वाढ होण्यासाठी लागवडीच्या सुरुवातीच्या काळात नियमित खते द्यावीत. एक वर्षाच्या झाडाला साधारणपणे १ घमेले शेणखत व १०० ते १५० ग्रॅम अमोनियम सल्फेट पुरेसे होते. दरवर्षी हे प्रमाण वाढवीत नेऊन 5 वर्षे वयाच्या झाडांना ४ ते ५ घमेली शेण खत व १ किलो अमोनियम सल्फेट द्यावे. लहान झाडांना खते नेहमी पावसाळयाच्या सुरुवातीला घालावीत नंतर मात्र मोठया झाडांना खते विश्रांततीचा काळ संपताना म्हणजे सप्टेबर महीन्याच्या अखेरीस द्यावीत. ५ ते ६ वर्षे वयाच्या झाडास ६०० ग्रॅम नत्र २५० ग्रॅम स्फूरद व २५० ग्रॅम पालाश दिल्याने फळे चांगल्या प्रतीची मिळतात.
पाणी :
अंजीराच्या झाडाला फार पाणी लागत नाही. परत फळझाड वाढीच्या काळात हंगाम, जमिनीचा मगदूर व मशागतीचा प्रकार यानुसार जरुरीप्रमाणे नियमित पाणी द्यावे झाड फळावर आल्यावर ऑक्टोबर ते मे महिन्यात नियमित पाणी द्यावे. जूलै व ऑगस्ट हा काळ झाडाच्या विश्रांतीचा असतो. फळे लागून वाढत असताना पाण्यात हयगय होऊ देऊ नये.
कारण त्यामुळे फळांच्या आकारावर अनिष्ठ परिणाम होतो. फळे पिकू लागल्यावर मात्र पाणी अतिशय कमी म्हणून आळी नुसती ओली होतील एवढे द्यावे. कारण अधिक पाण्याने फळाची गोडी कमी होते. फळे तोडणे पूर्ण झाल्यावर झाडाचे पाणी बंद करावे.
बहार धरणे :
अंजिराच्या झाडाला वर्षातून दोन वेळा बहार येतो. पावसाळ्यात येणाऱ्या बहाराला 'खट्टा' बहार आणि उन्हाळ्यात येणाऱ्या बहाराला 'मीठा' बहार असे म्हणतात. खट्टा बहाराची फळे जुलै - ऑगस्टमध्ये तयार होतात. परंतु ही फळे चांगल्या प्रतीची नसतात. मीठा बहाराची फळे मार्च - एप्रिलमध्ये तयार होतात. या फळांचा दर्जा व उत्पादन चांगले असल्यामुळे प्रामुख्याने मीठा बहार घेतला जातो. मीठा बहार घेण्यासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये हलकी मशागत करून पाणी न देत झाडांना ताण द्यावा. नंतर छाटणी करून खताची मात्रा द्यावी. वाफे बांधून बागेस पाणी देणे सुरू करावे. यामुळे झाडे सुप्तावस्थेतून बाहेर पडून ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यानच्या काळात झाडावर नवीन फुटीसह फळे येतात.
आंतरपिके :
आंतरपिके घेताना मूळ बागेची हेळसांड होता कामा नये व फळझाडांना आंतरपिकापासून उपद्रव ही होवू नये यासाठी आंतरपिकाची निवड फार महत्वाची ठरते. ही आंतरपिके कमी कालावधीची तर असावीतच शिवाय त्यांची मुळे खूप खोल जाणारी नसावीत. ताग, धैंचा वगैरे सारखी हिरवळीची पिके फरसबी, मटकी यासारखी व्दिदल पिके घेतल्याने जमिनीची प्रत सुधारण्यास मदत होते. ज्यावेळी आंतरपिक घेतले नाही त्यावेळी बाग स्वच्छ ठेवणे हे तितकेच जरुरीचे आहे.
किडी व रोग :
अंजिरावर तुडतुडे, खवले कीड, कोळी. पिठ्याकीड, साल व बुंधा पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी, मावा, फळे पोखरणारी अळी, इ. किडी तर तांबेरा रोग आढळतो. शिफारश केलेल्या फवारण्या करून त्यांचे नियंत्रण मिळवता येते.
काढणी :
दुस-या वर्षापासून अंजिरास थोडी थोडी फळे येऊ लागतात. परंतु फळाचे उत्पादन झाडे उत्महाराष्ट्रम पोसेपर्यंत घेऊ नयेत. चवथ्या वर्षापासून उत्पादन घेण्यास हरकत नाही. सात आठ वर्षाची झाडे झाल्यावर उत्पादन चांगले येते. उत्तम काळजी, मशागत, खते दिली तर एका झाडापासून २५ ते ४० किलो फळे मिळतात.
बहार धरल्यापासून १२० ते १४० दिवसात फळे काढणेस तयार होतात. फळ पक्व होताना फळावरील हिरवी छटा जाऊन फळ पिवळसर लालसर व जांभ्ळया रंगात दिसू लागते. पक्व फळ देठासह धारदार चाकूने कापून काढावे. दर दोन दिवसांनी फळ तोडणी करावी. फळे लवकर तयार होणेसाठी केलेंल्या प्रयोगांत ऍन्सीमिडाल २५० पीपीएम या प्रमाणात झाडावर फवारले असता फळे महिना ते सव्वा महिना आधी तयार होतात.
अंजिराची पूर्ण पिकलेली फळे लवकर खराब होतात. म्हणून विक्रीसाठी अंजिराची फळे बाहेरगावी पाठविताना फळे थोडी अपक्व असतानाच काढून पाठवितात. अंजिराची फळे बांबूच्या मजबूत टोपलीत अंजिराच्या पानांचा थर व फळांचा थर एकावर एक देऊन भरतात.
Comments
Post a Comment