सोयाबीन लागवड तंत्रज्ञान

सोयाबीन लागवड तंत्रज्ञान



जगामध्ये गळीत धान्यामध्ये सोयाबीन लागवड सर्वात जास्त असुन हे भारतातील एक प्रमुख पीक आहे. सोयाबीन मध्ये तेलाचे प्रमाण २०% व प्रथिनांचे प्रमाण ४०% आहे.

हवामान :

सोयाबीन हे पीक उष्णता व पाण्याच्या ताणास संवेदनशील असे पीक आहे. हे पीक २० ते ३५ सेल्सीयस उष्णतामान व ७०० ते १२०० मि. मी. पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात उत्तम येते व सूर्यप्रकाशाच्या कालावधीचा देखील पिकावर परीणाम होतो. भरपूर फुलो-यासाठी निदान दहा तासांपेक्षा जास्त काळोख्या रात्री असाव्या लागतात. म्हणून खरीप हंगामात हे पीक चांगले येते. साधारणत: हवामानाच्या वर्गीकरणानुसार कमी पावसाच्या, निश्चित पावसाचा व मध्यम ते भारी पावसाचा प्रदेश असे प्रकार पडतात. सोयाबीन हे हवामानाच्या वर्गीकरणानुसार मध्यम ते उशिरा कालावधीचा वाण टी. ए. एम. एस. ९८-२१ हा जास्त पावसाच्या प्रदेशांत तसेच संरक्षित ओलिताच्या सोय ओलिताच्या सोय नसल्यास वरील वाणांचे अपेक्षित उत्पादन येत नाही.

सोयाबीन पिकाकरीता लागणारी जमिन :

१) मध्यम स्वरुपाची
२) भुसभुशीत व पाण्याच्या निचरा होणारी
३) उत्तम सेंद्रीय पदार्थ असलेली
४) चोपण व क्षारपड जमिन वापरू नये
५) पुर्वी सुर्यफुल घेतलेले शेत वापरू नये
६) जमिन मे महिन्यात नांगरट केलेली उन्हाळ्यात तापू दिलेली स्वच्छ असावी.
७) जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ पर्यत असलेली निवडावी.
८) एकदम हलक्या मरमाड जमिनी या पिकास योग्य नसतात.


सोयाबीनच्या सुधारीत जाती :

जातीचे नाव

क्लार्क-६३, सुधारीत पेलीकन,कालीतुर,ली डेव्हीस,पंजाब,अंकुर,अंलकार, पी. के. -२६२,शिलाजित,पुस- ४०,दुर्गा, गौरव, को-१


बियाणे : सोयाबीनचे हेक्टरी ७५ किलो बियाणे लागते.

लागवडीपुर्वी बीज प्रक्रिया :

सोयाबीन च्या लागवडी पुर्वी रायझोबियम आणि सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरीया ची बीज प्रक्रिया करावी.
सोयाबीन पिकाच्या मुळांवरती रायझोबियम ही सहजीवी नत्र स्थिर करणारा बॅक्टेरिया (जीवाणू) गाठी करुन राहत असतो सोयाबीन च्या लागवडी पुर्वी रायझोबियम आणि सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरीया ची बीज प्रक्रिया करावी.
सोयाबीन पिकाच्या मुळांवरती रायझोबियम ही सहजीवी नत्र स्थिर करणारा बॅक्टेरिया (जीवाणू) गाठी करुन राहत असतो

हा बॅक्टेरिया हवेतील मुक्त स्वरुपातील नत्र, सोयाबीन पिकांस उपलब्ध होईल अशा स्वरुपात रुपांतरीत करीत असतो.
रायझोबियम च्या वापराने सोयबीन ची चांगली वाढ होते. फांद्यांची संख्या वाढते, तसेच जास्त प्रमाणात प्रोटिन्स तयार होवुन दाण्यांचे वजन देखिल वाढते.
सोयाबीन पिकापासुन २० टक्के इतके तेल मिळते. सोयाबीनच्या दाण्यांत २० टक्के तेल तयार होण्यात सल्फर (गंधक) हे अन्नद्रव्य फार महत्वाची भुमिका बजावित असते.


लागवड :

सोयाबीन ची लागवड जुन ते जुलै महिन्यात केली जाते.
लागवड करतांना पावसाचा अंदाज घेवुन लागवड करावी.
पेरणीतील अंतर हे दोन ओळीत ७५ से.मी. तर दोन रोपातील अंतर १० सेमी असावे.


तणनियंत्रण :

शेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.


अन्नद्रव्य व्यवस्थापन : (प्रमाण किलो प्रती एकर)

सोयाबीन पिकाच्या मुळांवरती रायझोबियम हा उपयुक्त जीवाणू राहत असल्याने या पिकांस वरुन नत्र खताची फारशी गरज भासत नाही.
सोयाबीनच्या मुळांवरील गाठी निट तयार होण्यासाठी पेरणी सोबत किंवा रोप उगवल्यानंतर लागलीच १० किलो फेरस सल्फेट १ एकरात जमिनीतुन द्यावे.


महाराष्ट्रात सोयाबीन पिकावर आढळणा-या प्रमुख किडी :

1) खोडमाशी – ही सोयाबीन पिकावरील महत्वाची कीड असून जवळजवळ सर्व भारतात या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. खोडमाशीची मादी सोयोबीनच्या पानावरील शीरेजवळ अंडी घालते. अंड्यातून अळी बाहेर येऊन शीरेतून देठात व देठातून खोडात पोखरत जाते. पिकांच्या सुरवातीच्या काळात या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास रोप मरते. उशिरा प्रादुर्भाव झाल्यास झाडाच्या वाढीवर परिणाम होऊन फुले व शेंगाचे प्रमाण कमी होते.


2) तंबाखुवरील पाने खाणारी अळी – अनुकुल हवामान मिळाल्यास या किडीचा फार मोठ्या प्रमाणावर उद्रेक होऊ शकतो. किडीचा मादी पतंग पानाच्या मागील बाजूस पुंजक्याने अंडी घालतो. अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या सुरवातीला समुहाने एकाच झाडाची पाने कुरतडतात. नंतर त्या सर्व शेतात पसरतात. कोवळ्या शेंगा असताना प्रादुर्भाव झाल्यास अळ्या शेंगा कुरतडून आतील दाणे खातात. अशावेळी पिकाचे उत्पादन 70 टक्क्यपेक्षा जास्त घटते.

3) बिहार सुरवंट – ही किड भारतात सर्वत्र आढळते. सुरवातीस अळ्या एकाच झाडावर पुजक्याने राहतात व पानांचे हरीतद्रव्य खाऊन टाकतात. त्यामुळे पाने जाळीदार होतात. त्यानंतर अळ्या सर्व शेतात पसरतात व पुर्ण पाने खातात. किडीच्या अळ्या केसाळ असून प्रथम त्यांचा रंग पिवळा असतो व नंतर तो राखाडी होतो.

4) पाने पोखरणारी अळी – कमी पाऊस व कोरडे हवामान असल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. किडीच्या अळ्या पानाच्या वरील बाजूस नागमोडी आकारात पाने पोखरत जातात व वाढ पुर्ण झाल्यावर तेथेच कोषावस्थेत जातात. एका पानावर एकापेक्षा जास्त अळ्यांचा हल्ला झाल्यास पान वाकडे तिकडे द्रोणाकार होते व नंतर सुकून गळून पडते.

5) पाने गुंडाळणारी अळी – सतत पाऊस व ढगाळ हवामान राहिल्यास या किडीचा उपद्रव वाढतो. किडीची अळी चकचकीत हिरव्या रंगाची असते व हात लावताच लांब उडून पडते. एक किंवा अधिक पाने एकमेकांना जोडून कडा पिवळ्या पडतात व पाने आकसली जातात.

6) मावा – ढगाळ व पावसाळी हवामानात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. कीड पानाच्या मागील बाजूस व खोडावर राहून रस शोषते. या किडीच्या अंगातून साखरेसारखा चिकट द्रव स्त्रवतो. त्यामुळे झाडावर काळी बुरशी वाढते. सोयोबीनवरील मावा किडीचा रंग पिवळा किंवा हिरवा असतो.

7) शेंगा पोखरणारी अळी – ही प्रामुख्याने कपाशी, तूर, हरबरा या पिकांवरील कीड असून गेल्या काही वर्षात सोयाबीन पिकावर जास्त प्रमाणात दिसून येऊ लागली आहे कीडीच्या अळ्या सुरवातीच्या काळात पाने खातात. शेंगा भरण्याच्या काळात शेगा पोखरून आतील दाणे कुरतडतात.

8) हिरवे तुडतुडे – या किडीची पिल्ले व पुर्ण वाढ झालेले कीटक पानाच्या मागील बाजूस राहून रस शोषतात. त्यामुळे पानांच्या कडा पिवळ्या पडतात व पाने आकसली जातात.

9) शेंगा पोखरणारी सुक्ष्म अळी – सांगली, कोल्हापूर या भागात तसेच कर्नाटक राज्यात या किडीच्या प्रादुर्भाव आढळून येतो. पिकाच्या दाणे भरण्याच्या काळात किडीची मादी शेंगावर अंडी घालते. किडीच्या अळ्या शेंगा पोखरून आतील दाणे खातात. शेंगा वरून निरोगी दिसतात परंतु अळ्या आतील दाणे खाऊन टाकतात. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव ओळखणे अवघड जाते.

10) हिरवा ढेकूण – ही कीड पानाच्या मागील बाजूस राहून पानातील रस शोषते. सोयोबीन पिकाच्या विषाणूजन्य रोगांच्या प्रसारास ही कीड मदत करते.

11) हुमणी – ही अनेक पिकांवर पडणारी कीड असून किडीच्या अळ्या जमिनीत राहून रोपांची मुळे खातात. त्यामुळे पिकाच्या सुरवातीच्या काळात रोपे सुकतात व मरतात. अळीचे कोष सुप्तावस्थेत जमिनीत राहतात. पावसाळ्याच्या सुरवातीस अनुकूल हवामान झाल्यावर भुंगेरे कोषातून बाहेर पडतात. हे भुंगेरे कडुनिंब व बाभळीची पाने खातात व शेणखतात अंडी घालतात. शेणखताद्वारे सर्व शेतात पसरते.

याखेरीज महाराष्ट्रात सोयोबीन पिकावर लाल मखमली अळी, उंट अळी, पांढरा भुंगेरा, करदोटा भुंगेरा इत्यादी किडींचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसून येतो.


12) पांढरी माशी – ही कीड पानाच्या मागील बाजूस राहून पानातील रस शोषते. सोयाबीन पिकाच्या विषाणूजन्य रोगांच्या प्रसारास ही कीड मदत करते.

कीडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकांच्या वापर :

1) खोडमाशीच्या नियंत्रणासाठी 10 टक्के दाणेदार फोरेट प्रती हेक्टरी 10 किलो या प्रमाणात पेरणीपुर्वी जमिनीत मिसळावे. थोयोमेथोक्झाम या किटकनाशकाची 3 ग्रँम प्रती किलो या प्रमाणात बीजप्रक्रीया देखील परिणामकारक आढळून आली आहे. पाने खाणा-या, पाने पोखरणा-या व गुंडाळणा-या अळ्यांच्या नियंत्रणासाठी हेक्टरी क्विनॉलफॉस 25 इ.सी. 1.5 लीटर किंवा क्लोरोपायरीफॉस 20 इ.सी. 1.5 लिटर किंवा इथोफेनप्राँक्स 10 इ.सी. 1 लिटर किंवा ट्रायझोफॉस 40 इ.सी. 800 मि.ली किंवा एन्डोसल्फान 35 इ.सी. 1.5 लिटर किंवा इथिऑन 50 इ.सी. 1.5 लीटर किंवा मेथोमिल 40 एस.पी. 1 किलो 1 किलो या किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. वरील कीटकनाशकांचा भुकटीच्या देखील हेक्टरी 20-25 कीलो या प्रमाणात धुरळणीसाठी वापर करावा.


2) रस शोषणा-या किडींच्या नियंत्रणासाठी मिथिल डिमेटाँन (0.03 टक्के) किंवा फॉस्फोमिडाँन (0.03 टक्के) किंवा डायमेथोएट (0.03 टक्के) या किटकनाशकांची फवारणी करावी.

3) हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी शेणखतात ते शेतात पसरण्यापुर्वी 10 टक्के लिंडेन किंवा 2 टक्के मॅलेथिऑन भुकटी मिसळावी. शेतात मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळल्यास 60 किलो प्रती हेक्टरी 5 टक्के क्लोरडेन किंवा हेप्टाक्लोर भुकटी जमिनीत मिसळावी. पावसाळ्याच्या सुरुवातीस भुंगेरे बाहेर पडल्यावर कडू निंबाच्या व बाभळीच्या झाडावर किटकनाशकाची फवारणी करून ते नष्ट करावेत.

महाराष्ट्रात सोयाबीन पिकावर आढळणारे प्रमुख रोग व त्यांचे नियंत्रण :

1) तांबेरा (Tambera) - सतत पाऊस व ढगाळ हवामान अशी अनुकूल परिस्थिती राहिल्यास या रोगाचा इतर भागात प्रसार होतो. या रोगामुळे पानांच्या मागील बाजूस लालसर, तपकीरी रंगाचे पुरळ दिसून येतात. पिकाची वाढ मंदावते व पाने गळतात. उशिरा पेरलेल्या सोयाबिन पिकाचे जास्त नुकसान होत असल्याने या भागातील शेतकरी 15 जुनपुर्वी पेरणी करतात. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पीक फुलावर असताना हेक्झाकोनँझोल 0.1 टक्के या रसायनांचा फवारा आवश्यक ठरतो.


2) खोडाचा राखी करपा – पिकाच्या उगवणीनंतर कोरडे व उष्ण हवामान असल्यास यो रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. रोपाची वाढ थांबून रोपे मरतात. खोडाच्या जमिनीलगतच्या भागावर काळ्या रंगाचे चट्टे दिसतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी थायरम 3-4 ग्रँम प्रती किलो किंवा कार्बेन्डँझिम 2-2.5 ग्रँम प्रती किलो या प्रमाणात बीजप्रक्रीया करावी. तसेच ट्रायकोडर्मा विरीडी या बुरशीपासून तयार केलेल्या बुरशीनाशकाची बीजप्रक्रीया उपयुक्त ठऱते.

3) करपा – या रोगाच्या प्रादुर्भाव झालेली रोपे कोलमडून पडतात व मरतात. जमिनीजवळ खोडावर पांढरी बुरशी आढळून येते. शेतातील बुरशीग्रस्त भाग हा रोगाचे प्रमाण वाढविण्यास कारणीभूत ठरतो. अशा भागाला प्रति हेक्टरी 20 किलो क्लोरबेनच्या द्रावणाने भिजवून प्रक्रीया करावी.

4) सुक्ष्म जिवाणूंचे पुरळ – रोगजनक जिवाणुमुळे पानावर लालसर तपकीरी रंगाचे फुगलेले ठीपके आढळून येतात. पावसाळी हवामानात रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. या रोगाचे नियंत्रण बीजप्रक्रीयेद्वारे किंवा कार्बोक्झीन (0.2 टक्के) च्या फवारणीने करता येते.

5) पानावरील ठीपके – बुरशीच्या निरनिराळ्या रोगजनक प्रजातीमुळे पानांवर पिवळे, लालसर, तपकीरी, बेडकाच्या डोळ्याच्या आकाराचे ठीपके आढळून येतात. बुरशीनाशकांच्या फवारणीने त्यांचे नियंत्रण करता येते. त्यासाठी कार्बेन्डँझिम, डायथेन एम – 45, डायथेन झेड – 78 व ताम्रयुक्त बुरशीनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करावा.

6) बियांवरील जांभळे डाग – पिकाच्या काढणीच्या वेळी सतत पाऊस असल्यास या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. असे रोगग्रस्त बियाणे पेरणीसाठी वापरू नये. तसेच पेरणीपुर्वी बीजप्रक्रीया करावी.

पीक कापणी व मळणी :

साधारणपणे सोयाबीनची सर्वे पाने झडून जातात. तसेच ९५ टक्के शेंगा पक्व झालेल्या असतात तेव्हा पीक कापणी योग्य झाले असे समजावे. परंतू सोयाबीनच्या जास्त कालावधीच्या जातीमध्ये शेंगा जरी पक्व झालेल्या दिसल्या तरी झाडावर हिरवी पाने दिसून येतात. तसेच १० टक्के शेंगा सुध्दा हिरव्या दिसतात. तेव्हा पीक पक्व झाल्याबरोबर ताबडतोब कापणी सुरू करावी अन्यथा उशीर झाल्यास शेंगा तडकून जातात. व उत्पन्नात घट येवू शकते. मोनॅटो ही जात उशिरा कापणीस फारच संवेदनशील आहे तसेच पी.के.-४५२ या जातीस कापणीस वेळ झाला असल्यास उत्पन्नात ८०-८५ टक्के घट येवू शकते. सोयाबीनमधील ओलाव्याचे प्रमाण १७ टक्के असताना या पिकाची कापणी करणे योग्य ठरते. तसेच मळणी करतांना सोयाबीनच्या दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १३-१५ टक्के असणे आवश्यक आहे. जर बियाणामधील ओलाव्याचे प्रमाण १३ टक्केपेक्षा कमी असल्यास अशावेळी मळणी करतांना दाण्याची फूट होऊन दाळ होण्याचे प्रमाण वाढते किंवा बियाण्याच्या वरच्या कवचाला तडा जाऊन उगवणशक्तीचा –हास झालेला दिसून येतो. मळणीच्या वेळी बियामधील ओलाव्याचे प्रमाण १७ टक्के पेक्षा जास्त असल्यास सुध्दा  बियाण्यास हानी पोहचू शकते. तेव्हा सोयाबीनच्या कापणी व मळणीच्या वेळी सोयाबीनमधील ओलाव्याचे  प्रमाण १३-१५ टक्के दरम्यान असणे अत्यावश्यक आहे. जेणे करून सोयाबीनची उगवणशक्ती टिकून राहून गुणवत्ता सुध्दा चांगली राहील.

सोयाबीनची कापणी व मळणी करण्याच्या पध्दती :

 १)      हाताने कापणी व मळणी :
सोयाबीनचे क्षेत्र कमी प्रमाणात असेल किंवा सोयाबिन बियाणे म्हणून उपयोगात आणावयाचे असल्यास हि पध्दत अधिक फायदेशिर ठरते अशा क्षेत्रातील पीक कापून शेतातच ४-५ दिवस सुकवायला सोडुन देऊन नंतर कोरड्या जागेवर किंवा ताडपत्रीवर छोट्या छोट्या गंज्या काडीने कींवा लाकडी दांड्याने ठोकून घ्याव्यात. या क्रियेत बियाला कमी मार लागल्यामूळे सोयाबिनचे फारच कमी नुकसान होते. म्हणून बियाण्याची गुनवत्ता उदा. उगवणशक्ती टीकून ठेवायची झाल्यास हाताणे कापणी व मळणी करणे अत्यावश्यक आहे.

२)     हाताने कापणी तथा मळणीयंत्राद्वारे मळणी :
हाताने कापणी केलेल्या सोयाबीनमधील ओलाव्याचे प्रमाण १३-१५ टक्के असतांना मळणी केल्यास बियाण्याची गुणवत्ता चांगली राहते. परंतू मळणी यंत्राच्या ड्रमच्या फे-याची गती ४०० फेरे प्रति मिनीटपेक्षा जास्त असू नये.

३)     कम्बाईनर द्वारे कापणी व मळणी :
पूर्वी कम्बाईनरव्दारे कापणी मळणी करणे फारसे प्रचलीत नव्हते परंतू आता काही भागात कम्बाईनरव्दारे कापणी व मळणी करण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. कापून ठेवलेल्या सोयाबिनची सुध्दा कम्बाईनरव्दारे मळणी करता येते. परंतू यात सोयाबीन दाळ होतांना दिसून येते. तसेच या सोयाबीनच्या बियाण्यांच्या कवचाला सुध्दा इजा पोहचुन त्याचा उगवनशक्तीवर परिणाम होतो. ज्या ठीकाणी सोयाबीन हे बिजोत्पादणासाठी घ्यावयाचे असेल त्या ठीकाणी कम्बाइनरद्वारे कापणी व मळणी करु नये. कम्बाईनरव्दारे कापणी मळणीकेल्यास ८-१० टक्के बियाण्याची घट येऊ शकते.
कापणी मळणी झल्यावर सोयाबीनचे बियाणे उफणूक, चांगले साफ करून व सुकवून मगच साठवावे. बियाणे सुकवितांना सोयाबीन मधील ओलाव्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जास्त ओलावा असल्यास बुरशीची वाढ होवून बियाण्याच्या प्रतीवर परीणाम होतो त्यासाठी वाढ होवून बियाण्याच्या प्रतिवर परीणाम होतो, त्यासाठी साठवणू आधी बियाणे सुकविणे अत्यांवश्यक आहे. सर्वसाधारणपणे सोयाबीन खळ्यावर किंवा ताडपत्रीवर ३-४ दिवस सुकवून घेतात. रात्री बियाणे झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी.
बियाणे म्हणून सोयाबीन तयार कराचे झाल्यास १०-१२ टक्के ओलाव्याचे प्रमाण असलेले सोयाबिन हे मशीनद्वारे वेगवेगळ्या चाळण्यातून तसेच पृथकाद्वारे वेगळे करून पिशव्या मध्ये साठवावे .

साठवणूक :

सोयाबीनची साठवणूक करतेवेळी खालील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
साठवणूक करतेवेळी लाकडी फळ्या टाकून त्यावर पोते ठेवावे जेणेकरून खालची ओल सोयाबीनला लागणार नाही.
पोत्याच्या चारही बाजूने हवा खेळती राहिल अशा रीतीने पोते ठेवावे.
एकावर एक अशी पोत्याची थप्पि न लावता दोन पोत्यावर एक अशी पोत्याची थप्पी लावावी. ५ पोत्यापेक्षा जास्त पोत्याची थप्पी लावू नये.
आवश्यकतेनूसार भांडाराची साफसफाई व आवश्यकता पडल्यास किटक नाशकाची फवारणी करावी.
अशा प्रकारे सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन केल्यास सोयाबीनचे २०-२५ क्विं. / हे. उत्पन्न मिळू शकते.


सोयाबीन पिकाच्या अधिक उत्पादनासाठी महत्वाचे मुद्दे :


१)       धुळ पेरणी करू नये.
२)      सुपिक, मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी.
३)       सेंद्रिय, रासायनिक व जिवाणू खतांचे शिफारसीनूसार एकात्मिक खत व्यवस्थापन करावे. नत्रयुक्त खतांचा प्रमाणबध्द वापर करावा.
४)      पेरणी वेळेवर म्हणजेच २० जून ते १० जुलै पर्यतच करावी.
५)     रोग व किड व्यवस्थापनाच्या दृष्टिने पिकांचा फेरपालट करावा.
६)      पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणशक्ति घरच्याघरी तपासून घ्यावी.
७)     शेतक-यांनी स्वत:चे बियाणे स्वत: तयार करावे.
८)      पेरणीपूर्व बियाण्यास बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करून त्यानंतर जिवाणू संवर्धक लावावे.
९)      बियाणे ४ सेंमी.पेक्षा जास्त खोल पेरू नये.
१०)    उताराला आडवी तसेच पूर्व- पश्चिमी पेरणी करावी.
११)     पेरणीसाठी आवश्यकतेपेक्षा दुप्पट बियाणे स्वत: जवळ असल्यास दुबार पेरणीची व्यवस्था करता येवू शकते.
१२)    पीक फुलो-यावर येईपर्यत तणमुक्त ठेवावे. पीक फुलो-यावर असतांना किंवा त्यानंतर डवरणी करू नये.
१३)    दुस-या डवरणीच्यावेळी डव-याला दोरी बांधावी जेणेकरून स-या तयार होतील, त्यामुळे मुलस्थानी जल व मृदसंधारण साधता येईल.
१४)   ज्या शेतात पाण्याचा निचरा होत नसेल अशा जमिनीत ५ क्विंटल/ हेक्टर जिप्सम पूर्व मशागतीच्यावेळी मिसळून द्यावे.
१५)   चूनखडीयुक्त शेतामध्ये ( सामू ८.० पेक्षा जास्त ) सोयाबीनच्या पीकास फेरस सल्फेट ०.५ टक्के ( ५० ग्रॅम ) + २५ टक्के ( २५ ग्रॅम ) कळीचा चूना १० लिटर पाण्यात मिसळून दोन वेळा फवारणी करावी. पहिली फवारणी पिक फुलो-यावर असतांना व दुसरी फवारणी शेंगा धरण्याच्या अवस्थेत करावी.
१६)    किडीची आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यावरच शिफारसीनूसार एकीकृत किड व्यवस्थापनाचा अवलंब करावा.
१७)   मुळ कुजव्या रोगाचे प्रमाण दर वर्षी वाढत आहे याकरीता ट्रायकोडर्मा व्हीरीडी हे जैविर बुरशीनाशक २.५ किलो + ५० किलो शेणखत मिसळून घ्यावे.
१८)    पीक फुलो-यावर असतांना व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांना पाण्याचा ताण पडल्यास व ओलीची सोय उपलब्ध असल्यास क्षेत्र संरक्षित ओलीत द्या.
१९)    मळणी करतांना ड्रमची गती ३००-४०० फेरे प्रति मिनिट या दरम्यान असावी. म्हणजे चांगली उगवणशक्ती असलेले बियाणे उपलब्ध होईल.
२०)   सोयाबीन हे पीक तांबेरा रोगास बळी पडत असल्यामुळे शक्यतोवर रबी हंगामात सोयाबीन घेवू नये.


Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology